"माफी ह्या शब्दाची लाज वाटणारी पिढी आमची. प्रचंड आत्मनिर्भर, आत्मविश्वासी आणि आत्ममग्न सुद्धा... फक्त मीपणाचा घोष. पण गंमत सांगू , या मीपणात दडला असतो तो संघर्ष.. कोणाला तरी नमवायचा. कुरघोडी करायचा". खिडकीत सहज येऊन बसलेल्या कावळ्याला उगाच खडे मारून त्रास देत ती बोलत होती ." स्वतःजवळ काय आहे ह्याची जाणीव आम्हाला फार उशीरा होते गं बयो. तुमच्या पिढीचं कसं आहे त्यात समाधान मानून पुढे सरकायचात आणि आमचं बघ ही स्पर्धा काही संपत नाही" कावळा कधीच उडून गेला पण त्याची उदासी मात्र हिच्या चेहऱ्यावर देऊन गेला " अति स्वावलंबी झालं की माणूस एकटा पडत जातो नं गं" अशा अवेळी तिचा कातर सूर... बयो थबकली " अरे ला कारे करणं शिकवता नं गं तुम्ही लहानपणापासून पण त्याची स्वरक्षणाची गरज सोडून इगो कधी होतो आमच्या ह्या एकाकी पिढीला कधी कळलंच नाही बघ.. हरण्यातली गंमत कुठेतरी हरवत चाललीय बयो.. जिंकण्यापेक्षा कोणालातरी नामोहरम करण्यातच जास्त मजा वाटतेय गं... कमावण्याची धुंदी इतकी की गमावण्याचा जमाखर्च राहिलाच बघ.. चुकतंय गं.. चुकतंय.." - आयुष्य जेमतेम अर्ध्यावर आलं असताना शेवटाचं तत्वज्ञान सांगत होती ती... तिच्या बयोला...